उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले – आशिष जयस्वाल

नागपूर : २८ सप्टेंबर – उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले आहे. आमदार आशीष जयस्वाल यांनी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस पक्षांना डिवचलं आहे. त्यामुळे आशीष जयस्वाल यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“हे काँग्रेसचे लोकं. मेले होते तुम्ही, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेलं लोकं जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की कुत्रं विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोकं जिवंत झालेले आहेत हे मी उघडपणे सांगतो,” असे आशीष जयस्वाल यांनी म्हटले आहे.
आशीष जयस्वाल हे रामटेक- नागपूर येथील शिवसेना समर्थक आमदार आहेत. २०१९ मध्ये रामटेक मतदारसंघात अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जिल्ह्य़ाच्या ग्रामीण राजकारणावरील काँग्रेस-राष्ट्रवादीची पारंपरिक पकड मोडीत काढत भाजपाने १२ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेवर सेनेच्या मदतीने भगवा फडकावला होता. पाच वर्षे पक्ष राज्यात सत्तेत असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्याचा धडाका तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला होता. मात्र ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपाला नाकारले. सहापैकी फक्त दोन जागा भाजपाला मिळाल्या. त्यापैकी एक जागा तर निसटत्या मताने जिंकली. २०१४ मध्ये त्यांच्याकडे पाच जागा होत्या. त्यानंतर २०१९ पासून काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचा एक असे आघाडीचे तीन आमदार आहेत.

Leave a Reply