भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही फॅशन – सुप्रिया सुळे

बुलडाणा : २६ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाईबद्दल आणि ईडीकडून येत असलेल्या नोटीसाबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. बुलडाणामध्ये त्या बोलत होत्या.
आज सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “जो भाजपच्या विरोधात बोलेल किंवा केंद्र सरकार विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस दिल्या जात आहेत. ही आजकाल फॅशन झाली आहे. आधी ज्याप्रमाणे पोस्टातून कार्ड यायची त्याप्रमाणे आता ईडीकडून नोटिसा यायला लागल्या आहेत. हे या देशाचे दुर्दैव असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या दौऱ्यामध्ये त्यांनी येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना केल्या. तर माँ जिजाऊच्या राजवाडा येथे जाऊन राजवाड्याची पाहणी केली. त्यानंतर लवकरच अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून सिंदखेड राजा विकासा संदर्भात बैठक लावण्यात येईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे. माँ जिजाऊच्या सिंदखेड राजा येथे राजवाडयाची पाहणी करत पर्यावरण स्थळासाठी बैठक लावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सिंदखेड राजा येथील जिजाऊंचे स्मारक हे राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे वैभव आहे. त्याचं जतन होणे गरजेचं आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन या वास्तूंचे जतन करण्यासाठी योग्य ती पावले उचलायला पाहिजेत असं म्हणत तेथे सर्व सुविधा पुरवायला पाहिजेत, यासाठी आम्ही सर्व जण मिळून प्रयत्न करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

Leave a Reply