मारबत विसर्जनाकरिता गेलेल्या चार युवकांचा नदीपात्रात वाहून गेल्याने मृत्यू

गोंदिया : ८ सप्टेंबर – आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील वाघ नदीपात्रात चार युवक वाहून गेल्याची घटना आज मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. संतोष अशोक बहेकार (१९), रोहित नंदकिशोर बहेकार (१८) मयूर अशोक खोब्रागडे (२१), सुमित दिलीप शेंडे (१६) सर्व रा. कालीमाटी ता. आमगाव अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकातर्फे बेपत्ता असलेल्या चारही युवकांचा शोध सुरू होता परंतु त्यांचे मृतदेह मिळाले नाही. आज दुपारी १२ वाजेपर्यंत चारही युवकांचे मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.
काल सकाळच्या सुमारास संतोष बहेकार, रोहित बहेकार, मयुर खोब्रागडे, सुमित शेंडे, कार्तिक दोनोडे, विशाल मेंढे व रोहित फुंडे हे सात मित्र मारबत विसर्जनाकरिता वाघ नदीच्या मुंडीपार येथील घुबडघाट काठावर गेले होते. दरम्यान सातही मित्रांनी नदीपात्रात आंघोळीचा बेत आखला. परंतु हा बेत चार मित्रांच्या जीवावर ओढावला. पाण्याचा अंदाज चुकल्याने संतोष, रोहित, मयूर, सुमित हे खोल पाण्यात बुडाले. इतर तिन्ही मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आमगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत तत्काळ बचाव व शोधकार्य सुरू केले होते.

Leave a Reply