तुम्ही कुणालाही आणले तरीही घोटाळ्याबाबत खुलासे करत राहणार – किरीट सोमय्या

ठाणे : ८ सप्टेंबर – तुम्ही कितीही मोठे गुंड आणलात, अगदी दाऊद इब्राहिमला जरी आणलात तरीही आपण घोटाळ्याबाबत खुलासे करत राहणारच, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी थेट ठाकरे सरकारलाच खुले आव्हान दिले आहे.
माजी खासदार आणि ज्येष्ठ भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी आज ठाण्यात अनेक गौप्यस्फोट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक नंबरचे घोटाळेबाज असून त्यांनी १९ बंगल्यांचा घोटाळा केल्याचा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचे लोक मला गोळ्या घालण्याच्या धमक्या देत असून त्यावर मुंबई पोलीस काहीच कारवाई करत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनच्या ११४ फ्लॅटला ओसी मिळाली नाही व स्वतः भूषण गगराणी यांनी हे सगळे अनधिकृत बांधकाम असून त्याला अधिकृत करता येणार नाही, असे बोलले आहेत. त्यामुळे प्रताप सरनाईक यांची सर्व मालमत्ता विकून ठाणे महानगरपालिकेने थकबाकी वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली. आपण ज्या १२ मंत्र्यांची नावे दिली आहेत ते सर्व गुन्हेगार असून शरद पवार त्यांना पाठीशी घालत आहेत तर भावना गवळी त्यांच्या बाबतीत असा खुलासा आपण पुण्यातील पत्रकार परिषदेत उद्या करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आपले तोंड बंद करण्याचा आदेश दिल्याने आपल्यावर सतत हल्ले होत असल्याचे पाहूनच केंद्र सरकारने आपल्याला झेड सिक्युरिटी दिल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलतांना सोमैय्या यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारला जागेवर आणण्याचे काम मी करत आहे, त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोप उडाली आहे. यामुळेच काही मंत्री गुंडांची मदत घेत आहेत. वाशिममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही गुंड लोक होते. मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला जरी आणले तरी मी घाबरणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

Leave a Reply