जे लोक वाटाघाटी करू शकत नाहीत, त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत – आशिष शेलार

मुंबई : १ सप्टेंबर – ‘ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे, तिथे निर्बंध कडक राहतात. रेस्टॉरण्ट, बारवरील निर्बंध त्याच धर्तीवर शिथिल करण्यात आले आहेत आणि वाटा न देऊ शकणारे मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धूप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत,’ असा गंभीर आरोप भाजपनं केला आहे.
मुंबईत वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार अँड. आशिष शेलार यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ‘जे लोक वाटाघाटी करू शकत नाहीत, त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत सुद्धा शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल शेलार यांनी केला. ‘राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या एका राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्या वतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करू असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या खासदाराच्या जावयानं हे धंदे बंद करावेत, अन्यथा आम्ही नाव जाहीर करू, असा इशाराही शेलार यांनी दिला. ‘करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या बाजूने भाजप आहे, पण वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या कामामध्ये आम्ही बरोबर नाही. आम्ही त्या विरोधात आहोत,’ असं शेलार म्हणाले.
‘आम्हाला केंद्राचं पत्र दाखवताय, केंद्राच्या पत्रात बार, पबचा उल्लेख आहे का? केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्रानं सांगितल्याप्रमाणं करोना टेस्ट वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे का लपवले? जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या आमदारांनी रांग तोडून आधी लस कशा मिळवल्या? आरोग्य सेवकांचं लसीकरण अद्यापही का झालेलं नाही. सोयीचं राजकारण करू नका,’ असं शेलार यांनी सुनावलं.

Leave a Reply