भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे, नोटीस न देताच ईडीची चौकशी सुरु – खा. भावना गवळी

वाशिम : ३० ऑगस्ट – शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावरून गवळी यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. आपल्याला ईडीची नोटीस आलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्र सरकाची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर ईडी होत असेल तर अनेकांच्या संस्था आणि कारखाने आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला.
मला कोणतीही नोटीस आलेली नाही. मला नोटीस मिळालेले नाही. त्यामुळेच हा सर्व प्रकार जुल्मी आहे. एक महिला सातत्याने निवडून येत असल्याने तिला डॅमेज करण्याचा हा प्रकार आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. भावना गवळी सातत्याने पाच वेळा निवडून येते आणि ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण देण्याचं काम करते. मी कुणाची जमीन घेतली नाही. सरकारचा पैसा वापरला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
किरीट सोमय्या वगैरे लोकांनी माझ्यावर आरोप केले होते. तेव्हा संस्थेतला हिशोब मला मिळाला नसल्याचा एफआयआर दिल्याचं मी सांगितलं होतं. त्यामुळे त्या एफआयआरमधील केवळ ७ कोटी ट्विट करायचे किंवा १८ कोटी कुठून आले या सर्व गोष्टी करायच्या. माझ्यावर आरोप करायचे आणि माझ्यावर ईडी लावायचे हे सत्र सुरू आहे. जुल्मी सत्रं सुरू आहे. आणीबाणी सारखं हे सत्रं आहे. काय चौकशी करायची ती जरुर करा, पण भावना गवळीची चौकशी करत असताना भाजपचे आमदार आहेत, त्यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा आरोप आहे. त्यांचे कागदपत्रं ईडी ऑफिसमध्ये आले आहेत. माझी चौकशी करत असाल तर त्यांचीही चौकशी करा. ही माझी केंद्र सरकारला विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.

Leave a Reply