जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करण्याच्या आरोपात १३ जणांना अटक

चंद्रपूर : २४ ऑगस्ट – जिवती तालुक्यातील १२ किलोमीटर अंतरावर अतिशय दुर्गम भागात असलेल्या वणी (खुर्द) या गावी भानामती व जादूटोणा केल्याच्या निव्वळ संशयावरून गावकऱ्यांनी एका कुटंबातील महिला व वयोवृद्धांना भरचौकात मांडवाच्या लाकडी खांबाला बांधून मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून, पाच जणांवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. कुणा महिलेच्या अंगात येते आणि तिच्या सांगण्यावरून शनिवारच्या सायंकाळी झालेली मारहाण ही अघोरी परंपरा आणि अशिक्षितपणाचाच परिपाक असल्याचे मत या घटनेनंतर व्यक्त होत आहे.
या प्रकरणी जिवती पोलिसांनी १३ जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा आरोपींना पोलिसांनी अटक असली असली तरी, अद्याप आरोपींची नावे देण्याचे पोलिस टाळत आहेत. तरीही प्राप्त माहितीनुसार, संशयित आरोपींमध्ये सुग्रीव शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, दादाराव कोटंबे, बालाजी कांबळे, अमोल शिंदे, गोविंद येरेकर, केशव कांबळे आणि सुरज कांबळे आणि तीन महिलांचा समावेश आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार संतोष अंबिके यांनी फरार आरोपी रात्री गावात झोपण्यास येतील याद़ृष्टीने पाळत ठेवली होती. त्यावेळी सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. अंगात आल्याने ज्या महिलांच्या सांगण्यावरून अन्यायग्रस्तांना मारहाण झाली, त्या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. दंगा प्रकरणी भादंवि कलम ३२५, १४३, १४७, १४९, ३४२ भादंवि जादूटोणा विरोधी कायदा कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या १३ आरोपींना आता न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे. गावातील लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात कुठलीतरी देवी आल्या आणि त्यांनी वयाने ज्येष्ठ अशा आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात बांधून मारहाण केली. वृद्ध महिलांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूकदर्शक बनले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. यात 7 जण जखमी झाले. त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांना घरी पाठवण्यात आले, तर पाच गंभीर जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष अंबिके करीत आहे.

Leave a Reply