माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी लोकशाहीचे आदर्श नेते – नितीन गडकरी

नवी दिल्ली : २० ऑगस्ट – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशाचे माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख ‘लोकशाहीचे आदर्श नेते’ असा केलाय. सोबतच, त्यांनी सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना ‘आत्ममंथनाचा’ सल्ला दिला आहे.
नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलंय. कृषी कायदे, इंधनाच्या वाढलेल्या किंमती, पेगॅसस हेरगिरी प्रकरण या मुद्यांवरून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्यामुळे पावसाळी अधिवेशनातील बहुतांश वेळ वाया गेला. या अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊ शकली नाही आणि वेळेअगोदरच अधिवेशन आटोपतं घ्यावं लागलं.
एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना नितीन गडकरी यांनी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांच्या वर्तनावर भाष्य करताना नेत्यांनी ‘आत्ममंथन’ करून आपलं वर्तन सुधारण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली.
अटल बिहारी वाजपेयी आणि जवाहर लाल नेहरू हे लोकशाहीचे आदर्श नेते होते. दोन्ही नेत्यांनी लोकशाही मर्यादेचं पालन करण्याची भूमिका मांडली. अटलजींचा राजकीय वारसा हीच आमची प्रेरणा आहे तर पंडित जवाहर लाल नेहरू यांनी भारताच्या लोकशाहीत महत्त्वाचं योगदान दिलंय, अशी भावना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी, महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असतानाच्या आठवणींनाही गडकरी यांनी उजाळा दिला. ‘एक वेळ अशीही होती जेव्हा सदनाच्या कामकाजात अडथळा उत्पन्न करण्यात मी स्वत: पुढाकार घेत होतो. त्या दिवसांत माझी भेट अटलजींशी झाली. त्यांनी मला समजावलं की लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वर्तन योग्य नाही. योग्य पद्धतीनं आपलं म्हणणं जनतेपर्यंत पोहचवणं हे अत्यंत गरजेचं आहे’, असं म्हणत त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांनाही समज दिलीय.
सदनातील आपल्या वर्तनासंबंधी सरकार आणि विरोधी पक्षांनी आत्ममंथन करण्याची गरज आहे. कारण आज जे विरोधकांत आहेत ते उद्या सत्तेत येऊ शकतात. आजचा सत्ताधारी पक्ष उद्या विरोधी बाकांवर बसू शकतात. आपल्या भूमिका बदलत राहतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ज्या पद्धतीचा गोंधळ पाहायला मिळाला त्यामुळे खूपच दु:ख झालं. मी माझ्या राजकीय कारकीर्दितले कित्येक वर्ष विरोधक म्हणूनच काम केलंय. कुठे ना कुठे सगळ्यांनाच मर्यादेचं पालन करणं आवश्यक आहे, अशी समज नितीन गडकरींनी दिलीय.

Leave a Reply