घरगुती वादातून पत्नीला जबर मारहाण करीत पतीने घेतला गळफास, दोघांचाही मृत्यू

चंद्रपूर : १८ ऑगस्ट – घरगुती वाद टोकाला गेल्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीला जबर मारहाण केली. त्यानंतर घरासमोर झाडाला गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली. तर गंभीर जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घुग्घुस येथील आमराई वार्डात सकाळी ही घटना घडली. सूरज गंगाधर माने (वय २८) व रत्नमाला सूरज माने (वय २५) अशी मृतक दाम्पत्याची नावे आहेत.
घुग्घुसच्या आमराई वार्डमध्ये सूरज माने हा पत्नी रत्नमाला व चार आणि दोन वर्षांच्या दोन मुलांसोबत राहत होता. सूरज ट्रॅक्टरचालक होता. पाच वर्षांपूर्वी रत्नमालासोबत त्याने प्रेमविवाह केला होता. दरम्यान, अलीकडे त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून भांडणे होत होती. वाद टोकाला गेल्याने संतप्त सूरजने पत्नी रत्नमालाला जबर मारहाण केली. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच विवेक बोढे, गणेश उईके, सागर बिऱ्हाडे हे घटनास्थळी दाखल झाले. जखमी रत्नमालाला घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेमुळे खळबळ उडाली असून घुग्घुस पोलिस तपास करीत आहे.

Leave a Reply