त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असे नाही – शरद पवारांच्या टीकेला राज्यपालांचे उत्तर

पुणे : १७ ऑगस्ट – राज्यातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला होता. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि राज्यसरकार यांच्यात कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरुन वाद रंगत असल्याचं पहायला मिळत आहे. आता शरद पवारांनी केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं, शरद पवार देशातील सन्मानीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असं नाही.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी म्हटलं, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. आता यापुढे १२ आमदारांबाबत आग्रही नाही असं राज्यपाल बोलले होते पण आता शहाण्यांना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे १२ आमदारांच्या प्रश्नाबाबत शब्द खर्ची घालणार नाही.
शरद पवारांनी पुढे म्हटलं, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत पत्र दिले होते. तिन्ही पक्षांचे नेते हे पत्र देऊन आले, पण राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही असा टोलाही शरद पवारांनी लगावला. तसेच यापुढे १२ आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही असा थेट इशाराच शरद पवारांनी दिला.

Leave a Reply