केंद्राचे घटनादुरुस्ती विधेयक ही ओबीसींची शुद्ध फसवणूक – शरद पवार

मुंबई : १६ ऑगस्ट – ‘आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती विधेयक मांडल्यामुळं आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे असं अनेकांना वाटलं होतं. पण हा गैरसमज असून ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. आधी हात बांधायचे आणि मग जेवणाचं आमंत्रण द्यायचं, जेवण वाढायचं अशातला हा प्रकार आहे,’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारवर केला.
मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार दिला गेला. त्यामुळं आरक्षणासाठी सरकारनं पाऊल टाकलं असा लोकांचा गैरसमज झाला. ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. १९९२ मध्ये ९ न्यायाधीशांच्या खंडपीठानं इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार खटल्यात आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता. ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही, असं सांगितलं होतं. केंद्रानं नंतर घटना दुरुस्ती करून १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली. आता ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार देऊन तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेऊ शकता अशी भूमिका केंद्रानं घेतली आहे. मात्र, त्याचा काही उपयोग होणार नाही. या घटना दुरुस्तीमुळं ओबीसींना काहीच मिळणार नाही, असं ते म्हणाले.
‘राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत छोट्या समूहाला आरक्षण मिळणार नाही. केंद्रानं जातीनिहाय जनगणना करावी, इम्पिरिकल डेटा राज्यांना द्यावा आणि ५० टक्के आरक्षण मर्यादेची अट काढून टाकावी. या तीन गोष्टी केल्याशिवाय ओबीसींसाठी काही निर्णय घेतला असं होणार नाही’, असंही पवार म्हणाले.

Leave a Reply