अजित पवारांनी मराठीत पत्र लिहून केली पंतप्रधानांना खास विनंती

पुणे : ११ ऑगस्ट – सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती मानवताविरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्या,’ अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
अजित पवार यांनी मराठी भाषेत हे पत्र लिहिलं आहे. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावं अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत. संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासीयाचं स्वप्न आहे. हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढ निर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे,’ असं अजित पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीनं जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्यानं दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीनं मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडं विनंती करत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्यानं मी सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत आहे. आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी,’ अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.

Leave a Reply