विदर्भातील ४ जिल्ह्यांची कोरोनमुक्तीकडे वाटचाल

भंडारा : ६ ऑगस्ट – सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात करोना साथरोगाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत असताना राज्यातील काही जिल्ह्यात मात्र दिलासादायक चित्र आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका बसला होता विदर्भाला. नागपूर करोनाचा हॉटस्पॉट ठरलेला असताना आता विदर्भातील रुग्णवाढीला आकडा खाली घसरला आहे. गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात शून्य रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी एकही रुग्ण न आढळून आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
भंडारा जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून एकही करोनाचा रुग्ण सापडला नाहीये. तर, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. एकमेव अॅक्टिव्ह रुग्णही करोनामुक्त होऊन घरी परतला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं भंडारा जिल्हा करोनामुक्त झाला आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील रुग्ण ६० हजारांपर्यंत पोहोचली होती. तर राज्यातील मृतांची संख्याही वाढत होती. मात्र, जून महिन्यापासून करोनाची लाट ओसरायला सुरुवात झाली. विदर्भात गुरुवारी दिवसभरात तपासण्यात आलेल्या अहवालांमध्ये ३८ नव्या बाधितांची नोंद झाली. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील काही दिवसांत अकराही जिल्ह्यांतील करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. नियम पाळून ही स्थिती कायम राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, राज्यात गुरुवारी सात हजार १२० करोनाबाधित बरे होऊन घरी परत गेले आहेत. त्यातुलनेत दिवसभरात सहा हजार ६९५ नवीन करोनारुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या २४ तासांत १२० करोनारुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply