नागपूर : ६ ऑगस्ट – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीनं आपल्या कारवाईचा फास अधिकाधिक आवळायला सुरुवात केली आहे. एकीकडे ईडीनं वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावून देखील अनिल देशमुख उपस्थित राहात नसताना दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरूच ठेवली आहे. आज दुपारी ईडीनं अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळते आहे. यासोबतच, ईडीनं नागपुरातल्या अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील छापे टाकल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.
सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्याालयावर छापे टाकले. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख यांना ईडीनं आत्तापर्यंत चार वेळा समन्स बजावून देखील ते अजूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील सोमवारी चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे गायब झाले आहेत? असा प्रश्न ईडी ला पडला आहे. यासंदर्भात आता ईडीला सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिल्या जाणाऱ्या आदेशांची प्रतीक्षा असून “अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, याची आम्हाला माहिती नाही”, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नेमकी अनिल देशमुख यांची चौकशी होणार का? आणि झाली, तर ती कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दरम्यान, दुसरीकडे सीबीआयकडून देखील अनिल देशमुख प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. सीबीआयनं न्यायालयात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईच्या एका एसीपींनी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा CBI नं केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. “महाराष्ट्र सरकार तपासामध्ये सहकार्य करत नाहीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील अनिल देशमुख प्रकरणातील तपास पथकाला सहकार्य केलं जात नाही. सहकार्य करण्याऐवजी मुंबईचे एक एसीपी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याला धमकी देत आहेत”, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.