संजय राऊत यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विदर्भ दौरा करायला सांगावे – रवी राणा यांचे आवाहन

अमरावती : ५ ऑगस्ट – मुसळधार पावसामुळे विदर्भात मोठे नुकसान झालं आहे. अमरावतीमध्ये देखील अनेकांची घरे पडली आहेत. अनेक शेतकरी वाहून गेलेत. पिकांचं देखील नुकसान झालं आहे, तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौरा केला नाही. अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या ३ महिन्यात ४९ बालमृत्यू झालेत, याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भ दौरा करायला लावा, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केलं आहे.
महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्यावर टीका करत आहेत.
काही दिवसांपूर्वी कोकणामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. तर तळीये गावातही दरड कोसळून जवळपास ८० जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याची पाहणी करण्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेले होते .तेव्हा त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारने जोरदार टीका केली होती.
आता पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मराठवाडा दौर्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आमदार रवी राणा यांनी उत्तर दिले आहे.

Leave a Reply