अर्थव्यवस्थेबद्दल मनमोहनसिंहांनी दिला सरकारला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : २५ जुलै – ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी देशवासियांना आणि मोदी सरकारला अर्थव्यवस्थेबद्दल सतर्कतेचा इशारा दिलाय. देशाच्या अर्थव्यवस्थेची १९९१ साली जी बिकट अवस्था होती, काहिशी तशीच स्थिती आगामी काळात निर्माण होऊ शकते. सरकारनं यासाठी तयार राहावं, अस मनमोहन सिंह यांनी म्हटलंय.
ही काही आनंदी किंवा आत्ममग्न होण्याची वेळ नाही तर ही आत्ममथन आणि विचार करण्याची वेळ आहे. १९९१ च्या संकटाच्या तुलनेत पुढची वाटचाल अधिक आव्हानात्मक आहे. प्रत्येक भारतीयाला निरोगी आणि सन्मानपूर्वक आयुष्य निश्चित व्हावं यासाठी एक राष्ट्र म्हणून आपली प्राथमिकता पुन्हा एकदा निश्चित करण्याची गरज आहे, असंही डॉ. सिंह यांनी यावेळी म्हटलंय.
करोना संक्रमणामुळे झालेलं आरोग्य आणि नोकऱ्यांच्या नुकसानीमुळे अतिशय दु:खी आहे. आरोग्य आणि शिक्षण विभाग सामाजिक क्षेत्रात मागे पडले. हे विभाग आपल्या आर्थिक प्रगतीच्या गतीसोबत चालू शकले नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव आणि नोकऱ्या गेल्या, हे टाळायला हवं होतं, अशी खंतही माजी पंतप्रधानांनी व्यक्त केलीय.
डॉ. मनमोहन सिंह यांनी २००४ ते २०१४ या काळात पंतप्रधानपदाची जबाबदारी मोठ्या खुबीने निभावली. १९९१ साली माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदा अर्थमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. आजपासून ३० वर्षांपूर्वी अर्थातच २४ जुलै १९९१ साली डॉ. मनमोहन सिंह यांनी आपला पहिला-वहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. हा अर्थसंकल्प देशातील आर्थिक उदारीकरणाचा पाया समजला जातो. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात डॉ. सिंह यांनी आपले विचार मांडले.

Leave a Reply