अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणं अशक्य – छगन भुजबळ

नाशिक : २५ जुलै – नियोजित ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये मार्चमध्ये होणार होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सदरचे संमेलन स्थगित करण्यात आले.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे साहितय संमेलन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना विषाणू ससंर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचे आयोजन करणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. ते ९४व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षदेखील आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पालकमंत्री भुजबळ यांना पत्र पाठवून संमेलन होणे शक्य आहे का आणि तारीख कळवावी असे पत्र पाठवले होते. छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या दुसरा लाटेतून नाशिककर आता कुठे सावरत आहे. त्यात पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने गर्दी होण्याचा जास्त धोका वर्तवला जात आहे, त्यामुळे साहित्य संमेलन शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
संमेलनामुळे हजार दोन हजार किंवा त्यापेक्षाही जास्त व्यक्ती एकत्र येतील आणि ते सध्याच्या परिस्थितीला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आम्हीदेखील ओबीसी आंदोलन थांबवले आहे असे भुजबळांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी साहित्य संमेलन आयोजित करणे अशक्य असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply