अनिल परब हे पळकुटे मंत्री -चित्रा वाघ यांचा सात्विक संताप

रत्नागिरी: २४ जुलै – चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत. एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले, अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री आहेत, अशी संतापजनक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
वशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. चिपळूणमध्ये महापुरात अडकलेल्या नागरिकांपैकी सुमारे दीड हजार नागरिकांची शुक्रवारी दिवसभरात सुटका करण्यात आली. मात्र अजूनही काही ठिकाणी नागरिक अडकले आहे. महापुराचे पाणी चिपळूण शहरात पहाटेपासून शिरू लागले. दुपारपर्यंत शहराचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली गेला. पूर्वानुभवानुसार नागरिकांनी पहिल्या मजल्यापर्यंत सर्व साहित्य हलवले होते. मात्र पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचल्याने भयावह स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे असंख्य नागरिक आपापल्या घरात किंवा दुकानांमध्ये अडकून पडले होते.

Leave a Reply