आता केंद्रामधील मोदी सरकारच डोकं ठिकाणावर आहे का नाही हे विचारण्याची वेळ – नाना पटोले

पुणे : २३ जुलै – केंद्र सरकारने कोणालाच सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला डोकं ठिकाणावर आहे का नाही अस विचारलं होत. तसंच आता केंद्रामधील मोदी सरकारच डोकं ठिकाणावर आहे का नाही हे विचारण्याची वेळ आली आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पटोले म्हणाले, कोरोनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. देशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. कोरोना मॅन मेड आहे हे अमेरिकाही सांगत आहे. चीनमधूनच कोरोनाची सुरवात झाली. चीनचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी महाबलीपूरम येथे एकत्र आले होते. त्यावेळी ते काय करत होते, त्यांची चर्चा कशाबद्दल झाली हे देशातल्या लोकांना समजले पाहिजे असेही पटोले म्हणाले.
राज्यात गेल्या काही वर्षांत ढगफुटीचे प्रमाण वाढले आहे. ढगफुटीमुळे परिस्थितीचा अंदाज लवकर येत नाही. त्यामुळे प्राणहानी आणि नुकसान होताना दिसत आहे. मात्र असे असले तरीही राज्य सरकार पूरस्थिती योग्य रीतीने हाताळत असल्याचा दावाही पटोले यांनी केला. भाजपचे नेते आता टीका करत आहेत परंतु ते सत्तेत असताना २०१९ ला जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस विदर्भात प्रचार करत होते. आता मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असेही पटोले म्हणाले.
पुण्यात तयार झालेली लस केंद्र सरकारने शत्रू देश असलेल्या पाकिस्तानला दिली. हीच लस जर देशातील नागरिकांना दिली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते. कारण लसीकरण झाल्यानंतर कोरोना झाला तरी मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे देशातील नागरिकांचे लसीकरण झाले असते तर गंगेत मृतदेह दिसले नसते असा टोला देखील पटोले यांनी केंद्र सरकारला लगावला.

Leave a Reply