पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची तासभर चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण

नवी दिल्ली:१७ जुलै- गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर, आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
ही भेट दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली आहे. त्यामुळे संकेतांनुसार शासकीय कार्यालयात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा होत नाही. मात्र, दोन्ही नेत्यांची तासभर चर्चा झाल्यामुळे, या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल, हे मानण्यास राजकीय विश्लेषक तयार नाहीत. विशेषत: या भेटीच्या आधीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि आता शरद पवारांनी पंतप्रधानांसोबत तासभर खलबतं केल्यानंतर त्यातून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
देशात २०१४ पासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मात्र, २०१९ मध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधल्या भेटीगाठी अगदीच कमी झाल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा केली जात आहे. या मुद्द्यावरून स्थानिक भाजपाकडून देखील सातत्याने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये राष्ट्रपतीपदाविषयी देखील चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीमागचं सर्वात मोठं कारण राज्यातील महाविकासआघाडी सरकारला असलेला धोका असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, अवध्या दोन दिवसांमध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये देशातील करोनाची परिस्थिती, फ्रान्समध्ये नव्याने सुरू झालेली राफेल कराराची चौकशी, देशातील लसीकरणाची अवस्था या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसारख्या नेत्यासोबत चर्चा करण्याची ही रणनीती असू शकते, असाही एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Reply