कोरोना हे थोतांड! रस्त्यावर उतरून मंदिरांची कुलुपं तोडा, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान

सांगली: १3 जुलै- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अंशतः निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सरकारवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. कोरोना म्हणजे सरकारचे थोतांड आहे. कोरोनामुळे सध्या मंदिरं बंद असून, देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. मंदिरांची कुलुपं तोडून मंदिर उघडी करायला पाहिजे, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे.. त्यांच्या या विधानाची चर्चा होत आहे.
सांगलीमध्ये माध्यमांशी बोलताना संभाजी भिडे यांनी हे विधान केलं आहे. सरकार कोरोनाचे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे. माझे केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे, तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरंच देवभक्त असाल, तर मंदिरांची कुलपे तोडून आत जाऊ, असं भिडे यांनी म्हटलं आहे. सरकार लॉकडाऊन लावतंय ते शंभर टक्के चूकच आहे. करोनामुळे आज देशात काय घडलं असेल, तर लोकांमध्ये फक्त भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, असंही भिडे म्हणाले.

Leave a Reply