मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत- नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

पुणे: १२ जुलै- गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सत्तेत आम्ही सोबत असलो तरी, मुख्यमंत्रिपद , गृहमंत्रिपद त्यांच्याकडे आहे असं सांगतानाच, नाना पटोले यांनी मला सुखाने जगू देणार नाहीत असंही म्हटलं आहे.
सोनिया गांधींनी महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचं त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल, पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे, असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न करणार, असाही आरोप यावेळी त्यांनी केला.

Leave a Reply