सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु – नवाब मलिक

मुंबई : ९ जुलै – ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक म्हणाले. यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.
ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
भाजपला वाटत असेल की, या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असं मलिक म्हणाले.
यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, युपी असतील तिथे विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम या यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे असंही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, एकनाथ खडसे गुरुवारी (8 जुलै) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. 9 तासांच्या चौकशीनंतर रात्री आठच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर पडले. यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलणं टाळलं. चौकशी झाल्यावर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले. त्यांच्या वकिलांनी माध्यमांना या चौकशीची माहिती दिली. यावेळी वकिलांनी ईडी चौकशीसाठी जितक्या वेळा बोलावेल तितक्या वेळा हजर राहण्याचं खडसेंनी आश्वासन दिल्याचं सांगितलं.

Leave a Reply