भाजप आमदारांचे निलंबन हा लोकशाहीचा खून – देवेंद्र फडणवीस

मुंबई : ५ जुलै – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी तालिका अध्यक्षांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजपा आमदारांकडून धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली. त्यानंतर भाजपाच्या दहा आमदारांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाच्या कारवाईवरुन देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले.
सभागृहात निलंबन प्रस्ताव मांडण्यापूर्वी तालिका अध्यक्षांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अध्यक्ष महोदय, आपण जी वस्तुस्थिती सांगितली, त्यात हे सांगितलं पाहिजे की, तिथे शिवसेनेचे आमदारही आले होते. ते शिवसेनेचे आमदार आणि भाजपाचे आमदार यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी मी स्वतः पूर्ण लोकांना बाहेर काढलं. हे खरं आहे की, आम्ही रागात होतो. बाचाबाची झाली. पण नंतर आपण गळाभेट घेतली. त्यानंतर आता असा प्रस्ताव येत असेल, तर… सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करून घ्याल. हे खरं आहे की, काही लोकांचे शब्द चांगले नव्हते. त्याचक्षणी मी तुमची माफी मागितली. हे देखील नोंदवलं पाहिजे. पण, हे पुढे करून विरोधकांची संख्या कमी करत असतील, तर हे योग्य नाही,” असं मत फडणवीस यांनी मांडलं.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “अध्यक्ष म्हणून नाही, तर भास्करराव जाधव म्हणूनही आपला सन्मान आम्ही करतो. त्यामुळे मला वाटत की, मोठ्या मनाने विरोधकांना बोलावून चर्चा केली पाहिजे. त्यानंतर कारवाई करायची असेल तर करावी; अन्यथा कुणी वासरू मारलं म्हणून दुसरा गाय मारेल, अशी अवस्था याठिकाणी होणार असेल तर लोकशाहीला योग्य नाही. जी घटना घडली, तिथे दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांना भिडले. पण मी स्वतः त्यांना मागे केलं. भांडण होऊ दिलं नाही. त्यामुळे असा प्रस्ताव आणणं योग्य होणार नाही,” असा इशारा फडणवीस यांनी दिला.
ठराव संमत झाल्यानंतर फडणवीस चांगलेच संतापले. भाजपा आमदारांच्या निलंबनानंतर सभागृहात बोलताना म्हणाले,”याठिकाणी जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे. लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. विरोधीपक्षाची संख्या कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो म्हणून हा प्रयत्न आहे. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतोय. हे एकतर्फी कामकाज आहे. हे मोगलाईचं कामकाज आहे. असं कामकाज आम्ही सहन करणार नाही,” असा संताप व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.

Leave a Reply