मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही – संजय राऊत

मुंबई:२८ जून-तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं नाही, तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाने पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान नागपूरला केली होती. यावर मी त्यांची भेट घेईन, मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं शिवसेना नेते खा. संजय राऊत माध्यमांशी बोलताना आज सोमवारी म्हणाले. फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही, असंही ते बोलताना म्हणाले.
देशात, राज्यात फार कमी चांगली नेतृत्व करणारी लोक आहेत. फडणवीस त्यापैकी एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला, तर भारतीय जनता पार्टीचं तसंच जनतेचंही मोठं नुकसान होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण पुर्नप्रस्थापित करण्यासाठी भाजपाकडून राज्यभर चक्का जाम आंदोलनही करण्यात आलं.
दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यासावर शिवसेनेनं भाजपाला टोलाही लगावला. बावनकुळेंचे कौतुक आज भाजपा करीत आहे, पण ओबीसींचे नेते बावनकुळे यांच्या आमदारकीचे तिकीट कापणारे हात कोणाचे होते, हेसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, असे शिवसेनेने म्हटले आहे. तर आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामधूनही राऊतांनी फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन!,” अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीसांना चिमटे काढले आहेत.

Leave a Reply