चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार – आशिष शेलार यांची टीका

मुंबई : २४ जून – चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीची आज बैठक झाली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेलं आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला असं हे सरकार आहे, असं शेलार म्हणाले.
महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मतानं, महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी केलं पाहिजे हे आधीच स्पष्ट केलं होतं. राज्यभर दौरा करणारा दुसरा नेता कुणीच नाही. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन आमची भूमिका आहे. इथं अहंकाराचं सरकारच नव्हतं, असं आशिष शेलार म्हणाले.
राजावाडी हॅास्पिटलमधील एका तरूणाचे डोळे उंदीर कुरडतात आणि आज त्याचा मृत्यूही झाला. कोव्हिडचे 11500 मृत्यू लपवले. हे महाराष्ट्र मॅाडेल आहे का? तो लसीसाठी काढलेला एक रकमी चेक कुठे गेला? पावसात भिजला का? त्या रकमेचं काय झालं? पुढे असतील तर ते पैसे पॅकेज म्हणून लगेच द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितल की मला पूर्णपणे बाजू मांडण्यास मदत केली नाही. याला जबाबदार कोण? मराठा आरक्षणात झालेली चुक होती की हा ठरवून केलेला कट होता हे तुम्ही आता उत्तर द्यायला हवं. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, असं शेलार म्हणाले.

Leave a Reply