कोरोना काळात फी घेणाऱ्या शाळांवर कारवाई सुरु

नागपूर : २० जून – कोरोनाकाळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणार्या शाळांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. असा प्रकार कुठेही झाल्यास थेट फौजदारी दाखल करावी, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.
नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण राज्यमंत्री कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली व पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन अतिरिक्त शुल्क वसूल करणार्या शाळांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. मागील वर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याऐवजी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. असे असतानाही ज्या बाबींची सेवाच मिळालेली नाही, अशा अनेक बाबींचे शुल्क वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. मुळात शाळाच बंद असताना असे शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयानेदेखील नैसर्गिक आपत्ती काळात शाळांनी अतिरिक्त शिक्षण शुल्क आकारू नये, असे निर्देश दिले आहेत. परंतु नागपूर विभागातील काही शाळा याकडे दुर्लक्ष करीत शिक्षण शुल्क वसूल करीत आहेत. नागपूर विभागातील ज्या शाळांनी पालकांकडून अतिरिक्त शिक्षण शुल्क वसूल केले त्यांच्याविरोधात थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. राज्य शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम २0११ ची संपूर्ण राज्यात कठोर अंमलबजावणी करा. प्रत्येक नियमाचे शाळांनी पालन करावे. कुठेही अतिरिक्त शुल्क आकारल्याचे आढळता कामा नये. पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आवश्यक तपासणी, कारवाई वेळीच करावी, असेही सांगण्यात आले.
या बैठकीला विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जमादार, सहाय्यक संचालक सतीश मेंढे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, विभागीय शुल्क नियमन समिती सदस्य चंद्रमणी बोरकर, बबिता शर्मा, अँड. पवन सहारे, अक्षय गूळ, अजय चालखुरे, अमित होशिंग आदी पालक उपस्थित होते.

Leave a Reply