माझ्या मंत्रिपदाबद्दल नेतेच निर्णय घेतील – नारायण राणेंचा खुलासा

मुंबई : १९ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेला विस्तार, मित्रपक्षांनी सोडलेली साथ, नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले नेते या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपमध्ये दाखल झालेले फायरब्रँड नेते नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नुकतंच नारायण राणे यांनी दिल्लीवारी केली होती. या दिल्ली दौऱ्यानंतर नारायण राणे यांचा मोदींच्या मंत्रिमंडलात समावेश होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. अद्याप भाजपकडून अधिकृत नावं जाहीर केलेली नाहीत. मात्र महाराष्ट्रातून दोन-तीन नावं चर्चेत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे नारायण राणे.
मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का असा प्रश्न आज नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. “केंद्रातील मंत्रिपदाबाबत भाजपाचे नेते निर्णय घेतील, त्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही. ज्यांना केद्रांत पाठवतील ते जातील” असं नारायण राणे म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात भाजपने रान पेटवलं असताना नारायण राणे यांना केंद्रात स्थान देत महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन शिवसेनेला जेरीस आणण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राणे हे बराच काळ शिवसेनेत होते. तसंच त्यांना मुंबई महापालिकेतील खाच-खळगे माहिती आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकतो, असा भाजपचा कयास असेल असंही त्यांनी म्हटलंय.

Leave a Reply