आलापन बंदोपाध्याय प्रकरण नेमके आहे काय?
पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांचे विद्यमान सल्लागार आलापन बंदोपाध्याय सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध केव्हाही गुन्हा दाखल होऊन प्रसंगी त्यांना अटकही होऊ शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. या प्रकरणात केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली प्रतिष्ठा अकारण पणाला लावत असल्याचा आरोप मोदी विरोधकांकडून होतो आहे. या प्रकरणात नेमके वास्तव काय? हे जाणून घ्यायला हवे.
कोणत्याही राज्याचा मुख्य सचिव हा सनदी अधिकारी असतो. देशातील सर्व सनदी अधिकारी हे केंद्र सरकारचे नोकर असतात आणि त्यांना त्या त्या राज्यामध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवले जात असते. त्यामुळे केंद्र सरकारला केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार असतो. ही बाब लक्षात घेता पंतप्रधान हा कोणत्याही सनदी अधिकाऱ्यांसाठी सर्वोच्च अधिकारी असतो आणि पंतप्रधानांना प्रोटोकॉल नुसार योग्य तो मान देणे हे प्रत्येक सनदी अधिकाऱ्याचे कोर्टाच्या असते
हीच बाब प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही लागू होते. भले पंतप्रधान त्यांच्या विरोधी पक्षाचा असो त्याला पंतप्रधान म्हणून योग्य तो मान देणे हे मुख्यमंत्र्यांनाही बंधनकारक असते.
बंदोपाध्याय हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत अर्धा तास उशिरा आले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण आटोपताच अर्ध्यातून उठून गेले. प्रोटोकॉलनुसार हा पंतप्रधानांचा अपमान ठरतो चक्रीवादळाच्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक बोलावली होती या बैठकीला मुख्य सचिव या नात्याने बंदोपाध्याय वेळेपूर्वी उपस्थित राहून पंतप्रधानांना सर्व माहिती द्यायला हवी होती. मात्र त्यांनी ते केले नाही ते मुख्यमंत्र्यांसोबत आले आणि मुख्यमंत्र्यांसोबतच निघून गेले इथे ते कर्तव्याला चुकले हे नाकारता येत नाही.
बंदोपाध्याय यांनी जे काही केले ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे लांगुलचालन करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी केले हे उघड आहे. मात्र हे करतांना आपण केंद्रीय सेवेत आहोत याचे भान त्यांनी ठेवायला हवे होते. त्यांनी ममतांना खुश करण्यामागे त्यांना मिळालेले अनेक फायदे दडले असल्याचे बोलले जाते. त्यांची पत्नी सोनाली बंदोपाध्याय या कोलकाता विद्यापीठात कुलसचिव पदावर होत्या ममतांच्या कृपेने त्यांना कुलगुरू बनवले गेले. कुलसचिव पदावरून कुलगुरू पदावर पदोन्नती दिली जाण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. याशिवाय सोनालीच्या बंधूंनाही एका सरकारी संस्थेत प्रमुख पदावर नियुक्ती देण्यात आली. इतरही अनेक नियमबाह्य फायदे बंदोपाध्याय यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.
सनदी अधिकारी हा घटनेच्या चौकटीत बांधील राहून काम करण्यासाठी कटिबद्ध असावा लागतो. त्याने राजकारणी व्यक्तींशी हितसंबंध जोपासून त्यांचा फायदा करून देणे हे घटनाबाह्य कृत्याचा ठरते या प्रकरणात बंडोपाध्याय यांनी घटनेची व्होयुक्त मोडली असेच म्हणता येते. असे असले तरी देशातील सनदी अधिकाऱ्यांची लॉबी बंदोपाध्याय यांची बाजू घेत पंतप्रधानांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते आहे अशी चर्चा सुरु आहे.
आता हे प्रकरण सनदी अधिकाऱ्यांची लॉबी माध्यमांच्या द्वारे भडकवून मोदींविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल हे निश्चित यावर या देशातील जनसामान्य प्रसंगी विश्वासही ठेवेल मोदी उगाचच प्रतिष्ठेचा प्रश्न करतात अशी टीकाही केली जाईल. मात्र नेमके प्रकरण काय आहे हे खोलात जाऊन कोणीच बघणार नाही
म्हणून तर नेमके प्रकरण काय आहे हे खोलात जाऊन बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. नेमके वास्तव काय ते मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हीही खोलात डोकावून बघा वास्तव लक्षात येईल.
अविनाश पाठक