मी त्यांच्याबाबत बोलावे इतके संजय राऊत महत्वाचे नाहीत – देवेंद्र फडणवीस

परभणी : २ जून – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत एवढे थोडेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं?, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीत त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, मी कालच राऊतांबद्दल बोललो आहे. त्यांच्याबद्दल मी रोज रोज काय बोलावं. ते एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
परभणीतील कोरोना परिस्थिती बरी आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न सुरू केला आहे. ही समाधानकारक बाब आहे, असं ते म्हणाले. तसेच रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयाचं ऑडिट केलं पाहिजे. त्याची माहिती सरकारने घेतली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली. राज्यातील कोरोना मृत्यूची संख्या दडवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. पीक विमा आणि केंद्र सरकारचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने टेंडर उशिरा काढले. तसेच पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जात होते. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विभ्याचा लाभ मिळत नाहीये, असं ते म्हणाले.

Leave a Reply