काही लोक महाज्योतीला बदनाम करण्याचं काम करीत आहेत – विजय वडेट्टीवार

नागपूर : ३१ मे – राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता सर्वोच्च न्यायालनाने रद्द केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींची राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचं सांगत जोरदार हल्ला चढवलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही लोक ओबीसी विद्यार्थ्यांची दिशाभूल करुन महाज्योती अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेला बदनाम करण्याचं काम करत असल्याचा आरोप केलाय.
कोरोनामुळे महाज्योतीला 2 ते 3 महिन्याचा वेळ मिळाला. काही लोकांनी महाज्योतीची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. महाज्योतीला प्राप्त झालेले 34 कोटी जमा आहेत. महाज्योतीला आलेले पैसे परत जाण्यासाठी नसतात. तर खात्यात जमा असतात, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर कमर्शियल पायलट म्हणून 20 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यासाठी नागपूर प्लाईंग क्लबला निधी दिला असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. महाज्योतीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणारे विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर असावेत. व्हीजेएनटीच्या भटक्या लोकांची माहिती घेण्यासाठीचं काम दिल्लीतील एका संस्थेला देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ओबीसी समाजासाठी चांगलं काम होत असताना काही लोकांच्या पोटात दुखत असल्याची टीकाही त्यांनि विरोधकांवर केलीय.
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ओबीसींचं सगळं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं नाही. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेल्यानं हा निर्णय आलाय. लवकरात लवकर मागासवर्गीय आयोग नेमला जावा, जातीनिहाय जनगणना व्हावी, यावर सरकार काम करतंय. त्यानंतर महिनाभरात आम्ही न्यायालयात जाऊ, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिलीय. लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. कुणी कोरोनाचा संकटाच्या काळात सेवा करत आहेत. तर कुणी संधी शोधतात, अशी टीका त्यांनी भाजपवर केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारलं असताना ‘भेटी होत असतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मी काल तासभर भेटलो. प्रत्येक भेट राजकारणासाठी नसते’, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय.

Leave a Reply