वाळूतस्करांनी केले माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण

यवतमाळ : २३ मे – यवतमाळ जिल्ह्यात रेती माफियांनी उच्छाद मांडला आहे. राजकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळामुळे रेती माफियांची दादागिरी आता सामान्य नागरिकांना ओलीस ठेवून मारहाण करण्यापर्यंत गेली आहे. बुधवारी घडलेल्या अशाच एका घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका आरटीआय (माहिती अधिकार) कार्यकर्त्याचे सिनेस्टाइल अपहरण करून त्याला ओलीस ठेवण्यात आले. समाजात आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरावी म्हणून या कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण करीत हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. गुरुवारी रात्री संबंधित कार्यकर्त्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

चंदन सुदाम हातागडे (३५) रा.नेताजी नगर, यवतमाळ याने गुरुवारी रात्री याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात बुधवारी तो आपला भाऊ विकास सोबत दुचाकीने भोसा येथे मित्राला भेटायला गेला असताना मागून आलेल्या दुचाकीवरील युवक समीर राजा याने मोबाइलवरून फोन केला व आपल्याला बोलण्यासाठी दिला. तेव्हा शगीर मिस्त्रीने समोरून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच तिथे चारचाकी वाहन आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दोन्ही भावांना वाहनात बसविले व मोबाइल हिसकावून घेतले. त्यानंतर पांढरकवडा मार्गावरील उड्डाण पुलानजीकच्या एस. एम. कन्स्ट्रक्शन येथे नेले. तिथे जबर मारहाण करण्यात आली. खिशातील २८ हजार रुपये काढून घेण्यात आले. विवस्त्र करून नग्न अवस्थेतील व्हिडिओ बनविला व प्रसारित केला. या मारहाणीत आपण दोन वेळा बेशुद्ध झालो. त्यानंतर आपल्याला शुद्धीवर आणण्यात आले. जातीवाचक शिवीगाळ केली गेली. त्यानंतर मारहाण करणारे सर्वजण तेथून पसार झाले, असे म्हटले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद शगीर मोहम्मद अन्सारी उर्फ शगीर मिस्त्री (४५), रा. पॉवरहाऊस, पांढरकवडा रोड, समीर राजा (२६), शगीरचा भाऊ सलीम अन्सारी (३९), सचिन महल्ले (४३), अतुल शामराव कुमटकर (३८), रा. तलावफैल, छोटू भांदक्कर (४०), रा. टिळकवाडी, शाज अहेमद नजीर अहमद (३६), अजय श्रीराम गोलाईत (३९), कादर याचा भाऊ मन्सूर अशा नऊ जणांविरुद्ध भादंवि कलम ३६५, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ तसेच अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मोहम्मद शगीर मोहम्मद अन्सारी, शाज अहेमद नजीर अहमद आणि अजय गोलाईत या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी दिली.
आरोपींमध्ये अनेकजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. जिल्ह्यात रेती तस्कारांमध्ये प्रचंड स्पर्धा असून यातून गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांनी आपापले परिसर वाटून घेतले आहेत. शिवाय उपसा करून आणलेली रेती शहरात अनेकांना दमदाटी करून मोकळ्या जागेत साठविण्यात येत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. या रेती तस्कारांना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याने त्यांची मुजोरी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. हा कथित माहिती अधिकार कार्यकर्ता माहितीच्या आधारे रेती माफियांना ब्लॅकमेलिंग करीत असल्याने त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात पैनगंगा, वर्धा, अडाण, बेंबळा या मोठ्या नद्या असून त्यातून रेती उपसा करण्याकरिता प्रचंड स्पर्धा आहे. यातूनच रेती माफियांच्या अनेक टोळ्या जिल्ह्यात अस्तित्वात आल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी उमरखेड येथील नायब तहसीलदारांवर रेती तस्कारांनी जीवघेणा चाकूहल्ला केला होता. घाटंजी येथे तहसीलदारांच्या निवासस्थानासमोरील वाहन पेटवून दिले होते. माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या अपहरण व माहरणीमुळे रेती तस्कारांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply