मनाच्या हिंदोळ्यावर (ललितबंध)

आपलं मन

प्रत्यक्षात अनुभवलेले प्रसंग हे कानांनी ऐकलेल्या प्रसंगा पेक्षा अधिक महत्त्वाचे असतात मी असा मनोमन विचार केला तेव्हा माझ्या असे लक्षात आलं की आपल्याला जी गोष्ट अधिक आवडते ती आपल्याला सहजासहजी कधीच मिळत नाही ते मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात त्याच प्रमाणे जी व्यक्ती सर्वात जास्त आवडते ती का आवडते हे ठरवणं कधीकधी कठीण होऊन जात.
रोजच्या जीवनातील उदाहरण बघू, रोजच्या जीवनात अनेक लोक भेटतात, ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलो नाही अशा व्यक्ती मनाच्या हिंदोळ्यावर राज्य करून जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. काही व्यक्ती मनाच्या अत्यंत जवळ असतात, तर काही व्यक्ती ही पिंपळाच्या पानासारखी असतात. त्या पानाची जाळी झाली तरी ती आपल्या मनाच्या पुस्तकात जपून ठेवाविशी वाटतात
समोरच्या बद्दल वाटणारी जाणीव व आपली बुद्धि यातून होणारी भावभावना, वेगवेगळ्या छटा, आचार विचार, त्यांची मत, ज्ञान, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, ह्यान सगळ्यांचा मिलाप जिथे होतो ते असतं आपलं मन. मन हा एक अदृश्य अवयव होय. डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असेल असे नाही आणि या सत्याला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते डोळ्यांना दिसायला हव असंही नाही. म्हणूनच मन हे अदृश्य असले तरी त्यांच असण हे अनुभवता येतं व ते जाणवतं पण.
मला माझ्या जवळच्या लोकांशी बोलताना हे प्रकर्षाने जाणवले, आपल्या मनातून जी स्पंदने निघतात, लहरी निघतात, ती आपल्या मनाला प्रिय असणाऱ्या जवळ असणाऱ्या व्यक्तीत ती जाणवतात. हा अनुभव मला जवळून आला. क्षणभर मी डोळे बंद केले तर मला त्या व्यक्तींचा सहवास, स्पर्श माझ्या मनाच्या हिंदोळ्यावर झुलताना दिसला. आपल्या बंद डोळ्यांना खूप गरज असताना साथ देणाऱ्या त्या हातांचा स्पर्श मला प्रकर्षाने जाणवला. आपल्या उघड्या डोळ्यांना फक्त सभोवतालचं भौतिक सुख दिसत, पण बंद डोळ्यांचा अनुभव हा नेहमी खरा ठरतो.
आज मी माझे आईपण गमावून बसली. ह्या व्यक्तीने जन्म दिल्यापासून माझ्या मनावर राज्य केले. ही जेव्हा माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली तेव्हा मला होणारे दुःख फक्त माझ्या मनानी जाणले. या दुःखाचे प्रतिबिंब माझ्या डोळ्यातून झिरपले आणि ते माझ्या मनाला चटका लावून गेले. काय असत ना, आकाश हे असंख्य तारांनी भरलेलं असत पण आपल्याला तुटलेला ताराच का लक्षात राहतो? आठवणी या तुटलेल्या तारासारख्याच असतात. आई माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली. ती आता परत येणार नाही. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. म्हणूनच मन सांभाळन कधी-कधी खूप कठीण होऊन जातात.
फुलांची साठवण करण सोप असत. पण त्याचा गंध हा मनातच साठवावा लागतो. तसेच सुख हे क्षणिक असतात त्यांना टिकवून ठेवता येत नाही, पण मनात साठवून ठेवल्यावर ते चिरतरुण राहतील यात काही शंका नाही.

पल्लवी उधोजी

Leave a Reply