सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी कोरोनावर विजय मिळवू – यशोमती ठाकूर

अमरावती : १ मे – संकटाने डगमगून न जाता त्याचा धीरोदात्तपणे सामना करत बिमोड करणे हा महाराष्ट्राचा कायम स्वभाव राहिला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी कोरोना संकटावरही विजय मिळवून महाराष्ट्र प्रगतीकडे दमदार वाटचाल करेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अँड. ठाकूर यांच्याहस्ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्रदिन व कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाची जागतिक आपत्ती येऊनही महाराष्ट्र स्थिर राहिला, परिस्थितीशी लढत राहिला आणि आताही लढत आहे. प्रत्येक अडचणीवर मात करण्यात येत आहे. हे सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. गेले वर्षभर प्रशासन न थकता अहोरात्र कार्यरत आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, नोकरदार आणि नागरिक सारेच एकजुटीने काम करत आहेत. कुठल्याही संकटांनी डगमगून न जाता महाराष्ट्रभूमीच्या प्रगतीची पुनर्आखणी करण्याचा व त्या दिशेने दमदार वाटचाल करण्याचा आमचा निर्धार आहे. सर्वधर्म, जाती, पंथ, विचारांच्या समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी पालकमंत्री ठाकूर यांनी म्हटले.
अनुसूचित जमातींसाठी खावटी अनुदान योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. आदिवासी बांधवांना धान्य व गरजेच्या वस्तू मिळवून देण्यासाठी या योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सुरु झालेली शिवभोजन योजना कोरोनाकाळात गरीब व गरजू जनतेसाठी आधार ठरत आहे. त्याचबरोबर कोरोनाची साथ लक्षात घेऊन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply