कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई : २७ एप्रिल – देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले. करोना फैलावास केवळ निवडणूक आयोगच जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने आयोगाला फटकारले.
येत्या २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान करोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली. करोना नियमांचे पालन करून मतमोजणी प्रक्रिया पार
पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत, असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात सांगताच न्यायालयाने आयोगाची कानउघाडणी केली.
राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने करोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरले पाहिजे, असे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केले. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आयोगाला दिला.
याआधी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान करोना नियमांचे पालन होत नसल्याबद्दल कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकांदरम्यान करोना नियम पालनाबाबतच्या तीन याचिकांवर मुख्य न्यायाधीश टी. बी. एन. राधाकृष्णन यांच्या खंडपीठाने २२ एप्रिलला सुनावणी घेतली होती. करोना नियम पालनाबाबत केवळ परिपत्रक काढणे आणि बैठक घेणे पुरेसे नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती.

Leave a Reply