केंद्राने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करावी – नसीम खान

ठाणे : १५ एप्रिल – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक बाबींचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील भाजप सरकारने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी मांडले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार प.पू.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यात शहर मध्यवर्ती काॅग्रेस कार्यालयात या शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमाला नसीम खान यांनी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी त्यांनी रक्तदान शिबिराचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
बाहेरच्या देशात मदत पाठवायची काय गरज होती?
महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील सरकारने सर्व गोष्टी बाजूला ठेवून महाराष्ट्राला मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मात्र अडवणूक करु नये, 20 लाख कोटीची घोषणा पंतप्रधानांनी केली. पण प्रत्यक्षात काहीच मदत दिलेली नाही. एकीकडे आपल्या देशातील लोकांना मदतीची गरज असताना बाहेरच्या देशात मदत पाठवायची काय गरज होती? असा सवाल नसीम खान यांनी केला आहे.
काँग्रेसकडून जिल्हा-जिल्ह्यात मदत केंद्र
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लाॅकडाऊनची घोषणा केली. कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन महत्वाचा आहे. या लॉकडाऊनमध्ये समाजातील लोकांना आर्थिक आणि जीवनावश्यक साहित्याच्या रूपाने मदत करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री यांनी दिले. तर दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत करण्यासाठी काँग्रेसने जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये मदत केंद्र सुरु केले आहेत, अशी माहिती नसीम खान यांनी दिली. या कार्यक्रमात ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply